छत्रपती संभाजीनगर :: सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. जुना वाद मिटवायचा असल्याचे कारण देत तरुणाला निर्जनस्थळी बोलावत ८ ते १० जणांनी चाकू व बॅटने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेल समोरील एन १३ मैदानावर ही घटना घडली आहे.
दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे हा २६ वर्षीय तरुण चेतना नगर हर्सूल येथे वास्तव्यास होता. दिनेशचा ६ महिन्यांपूर्वी एका इसमाशी वाद झाला होता. या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष पेटला. दोन दिवसांपासून बबलू मारेकरी हे त्याच्या माघावर होते. परंतु आज बबलू आज त्यांच्या जाळ्यात अडकला. जुना वाद मिटवायचा आहे, असा बहाणा बनवून त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि डाव टाकला.
आपले शत्रू आपल्याविरोधात असा कट रचतील यापासून अनभिज्ञ असणाऱ्या बबलूने हर्सूल जेलसमोरील एन १३ येथील मैदान गाठले. त्याचे इतर सहकारी देखील त्याच्यासोबत होते. आरोपींनी बबलूच्या गळत हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्या कोणीतरी बबलूच्या पोटात चाकूने भोसकले. तर इतर काही तरुणांनी त्याला बॅटने मारहाण केली. यात बबलू गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण देखील गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गणेश सोनवणे, संकेत गायकवाड, अनिकेत गायकवाड, योगेश यासह इतर आरोपींचा यात समावेश असल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.