छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एक दिवस बाकी आहे. त्यातच शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून मध्य विधानसभेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी (दि.२८) निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी एमआयएमचा उमेदवार विजयी होऊ नये, यासाठी आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतांश ठिकाणी शिंदे सेना आणि ठाकरे सेना अशी लढत होणार आहे. शहरातील मध्य मतदार संघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, तनवाणी यांनी कालच उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली बाजारपेठेत गर्दी होऊन नागरिकांना त्रास होईल असे कारण देत रद्द केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले. 

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. यावेळी देखील प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात आहेत. २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *