छत्रपती संभाजीनगर. :: रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात रामगिरी महाराजांच्या अटकेसाठी आंदोलने, निषेध मोर्चे, निदर्शने करण्यात आली होती.शिवाय देशभरात रामगिरी महाराज यांच्यावर 60 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवण्यात आले होते. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम धर्मीयांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे.
राज्य सरकारकडून रामगिरी महाराज यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी `चलो मुंबई`चा नारा दिला आहे. त्यानूसार उद्या (ता.23) रोजी सकाळी साडेसात वाजता संभाजीनगरातून हजारो वाहनांनी एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. तर राज्यभरातील मुस्लिम संघटना, संस्थांचे प्रतिनिधी कार्यकर्ते मुंबईच्या मार्गावरून त्यांना जोडले जाणार आहे. उद्याची रॅली ही राज्यातील सर्वात मोठी असेल, ज्याची नोंद देशाकडून घेतली जाईल, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला. शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईकडे निघालो असताना सरकारकडूनच यात खोडा घातला जात आहे, त्यामुळे आम्ही गंगापूर-वैजापूर मार्गे न जाता आता थेट समृद्धी महामार्गावरून मुंबईला जाणार आहोत, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. गंगापूरमध्ये सरकारने रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवनगी दिली आहे. आमच्या मुंबई रॅलीला गालबोट लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण त्यांच्या षडयंत्राला बळी पाडून आम्ही काही चुकीचे करणार नाही. त्यासाठी गंगापूर मार्गे न जाता आता आमची सगळी वाहने समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे सकाळी साडेसात वाजता निघतील. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा सगळ्याच राज्यातून मुंबईच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी आपापल्या सोयीने आम्हाला जोडले जावे, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी केले आहे.
मुंबईत जाऊन सत्ताधाऱ्यांना हे राज्य, देश घटनेवर चालेल याची आठवण संविधानाची प्रत देऊन करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून जे पोलिस अधिकारी चुकीचे काम करत आहे, त्यांना पोलिस गणवेश अंगावर चढवताना घेतलेल्या शपथेची आठवण आम्ही करून देणार आहोत. आमच्या या मोर्चावर टीका केली जात आहे, ज्यांना टीका करायची आहे त्यांनी येऊ नये, पण आम्हाला विरोधही करू नये.आज मुसलमान संकटात आहे, अशावेळी एकदा एकजूट दाखवण्यासाठी पक्ष, संघटना, राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र या, अशी साद इम्तियाज जलील यांनी घातली आहे.