छत्रपती संभाजीनगर. :: सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती-जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा १ ऑगस्टला अन्यायकारक असा संविधानविरोधी निर्णय दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमातींचे अंतर्गत जातींचे गट निर्माण होऊन बिंदूनामावली रोस्टरनुसार त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. पर्यायाने आरक्षण संपुष्टात येणार आहे.
या निर्णयाच्या विरोधात अनुसूचित जाती-जमातींमधील सर्व समाजांच्यावतीने उद्या (ता. २१) सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सामूहिक भारत बंद ची सर्वात केली जाणार आहे. या बंदमध्ये भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल, आरक्षण बचाव संघर्ष समिती तसेच विविध आंबेडकरवादी संघटना सहभागी होणार असल्याचे विजय वाहुळ यांनी सांगितले.
भारत बंदबाबत अद्याप कोणत्याही राज्य सरकारने अधिकृतपणे मार्गदर्शक तत्वं जाहीर केलेली नाहीत. मात्र भारत बंद दरम्यान सार्वजनिक परिवहन सेवा बंद असू शकतात. काही ठिकाणी खासगी ऑफिसेस बंद राहू शकतात.तर रुग्णालयं, रुग्णवाहिका अशा आप्तकालीन सेवा सुरू राहणार आहेत. बँक आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे हे चालू राहण्याची शक्यता आहे.