जालना. :: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी त्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र आरक्षणाची डेडलाईन संपल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे, आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि शुगर कमी झाली आहे. शासकीय आरोग्य विभागाच्या पथकानं याबाबत माहिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे, आणि ते आपल्या या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान दुसरीकडे ओबीसी समाजामधून मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहेत. या यात्रेची सुरुवात अंतरवाली सराटीजवळ असलेल्या दोधड गावाजवळील स्तंभापासून होणार आहे. ही यात्रा वडीगोद्री गावातून जाणार असल्याने पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोस्त तैनात केला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच आज तिसरा दिवस आहे, मात्र सरकारकडून कोणाचाही अद्याप संपर्क झालेला नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *