छत्रपती संभाजीनगर. : : महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश फुल्ल झाल्याने खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या शाळा मनपाच्या ताब्यात घेऊन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांच्यावतीने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या सर्व शाळा आता स्मार्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु, महापालिकेने सन २०१७ ला विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण पुढे करत ५ शाळा बंद करून खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्यापैकी काही शाळेने महानगरपालिकेचे लाखो रुपयांचे भाडे थकविलेले आहे. सन २०२४ ला तेच कारण पुढे करत खासगी विकासकांना मनपाच्या १४ शाळा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या शाळेमध्ये प्रवेश फुल्ल झाल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा वाढता ओघ बघता ज्या मनपाच्या शाळा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत त्या महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याठिकाणी स्मार्ट शाळा सुरू कराव्यात. त्याचप्रमाणे यावर्षी १४ शाळा भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा.
तसेच महापालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळांचे एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. ते त्वरित बंद करून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश द्यावा या सर्व मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, पवन पवार, संदीप अहिरे, आकाश साबळे, सुरेश साळवे याच्या स्वाक्षऱ्या आहेत.