छत्रपती संभाजीनगर – महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये वर्षभरात जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत २७ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, सर्व विभागांच्या समन्वयाने बालविवाह प्रतिबंध मोहीम गावागावात राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक गुरमे, आरोग्य विभाग समन्वयक डॉ लड्डा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी,समितीचे संबंधित सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, एप्रिल २०२३ ते ऑक्टोंबर २०२३ दरम्यान जिल्हा बालसंरक्षण कक्षाने कारवाई करुन २७ बालविवाह रोखले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ८, पैठण ८, गंगापूर ५, वैजापूर, कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड येथे प्रत्येकी एक असे एकूण २७ बालविवाह रोखले आहेत. या कारवाईतील बालिकांचे शिक्षण, पुनर्वसन या साठी उपाययोजना करण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना म्हणाले की, कमी वयात बालविवाह केल्यामुळे बालकांच्या आरोग्यावर तसेच भावी पिढीवर दूरगामी परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी शाळा व ग्रामपंचायत पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी पालकांचे समुपदेशन आणि जाणीव जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जावे. पंचायत समितीमध्ये पथनाट्य,चित्रफिती, माहितीपटाच्या माध्यमातून जागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की, शिक्षण विभाग, महिला व बालविकास, आरोग्य व पोलीस अशा सर्व विभागांनी समन्वय राखून बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई करावी. बालविवाह प्रतिबंध करुन बालिकांना मोफत निवारागृह, संरक्षण इ. सुविधा देण्यात याव्या.
तालुकास्तरावर बाल संरक्षण अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आढावा घ्यावा. या सर्व प्रक्रियेत पोलीस पाटील यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पोलीस विभागामार्फत समाज माध्यमाद्वारे, दामिनी पथकाच्या साह्याने तसेच विविध शाळा महाविद्यालयातून जाणीव जागृती करावी. त्यासाठी पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे गुरमे यांनी सांगितले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ संदर्भात गृहहभेटी वाढवून याबाबतचा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांनी एकत्रितपणे सादर करावा असे निर्देश डॉ.मीना यांनी दिले. बालविवाहासंदर्भात वा बालकांच्या हक्कांचे हनन होत असल्यास टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ वर तक्रार द्यावी,असे आवाहन डॉ. मीना यांनी केले.