छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल.

या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळ तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे. 

यावेळी लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जातील असे मानले जात आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे. गेल्या वेळी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपनं 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *