पुणे : रोहित पवारांची संस्था असणाऱ्या बारामती ऍग्रोच्या कन्नड युनिटवर ईडीने दोन दिवसांपूर्वी जप्ती आणली, या कारवाईनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत काही आरोप केले आहेत. ईडीने जप्ती आणल्याचं मला ट्विटर अकाऊंटवरून कळालं, पण प्रत्यक्षात आम्हाला अद्यापही जप्तीची नोटीस मिळालेली नाही, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. या साखर कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कामगारांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांनी अजिबात घाबरू नये, असं रोहित पवार म्हणाले. साडेतीन लाख लोक कन्नड युनिटवर अवलंबून आहेत, म्हणूनच राजकीय सुडापोटी कारवाई करू पाहणाऱ्या मंडळींनी याबाबतीत गांभिर्याने विचार करावा. यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी आमचे कामगारही पगार द्यायला तयार आहेत. ईडीच्या प्रेसनोटमध्ये अनेक चुका आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला.
‘कन्नड कारखान्याचं टेंडर आम्ही नियमानुसारच भरलं होतं, आता हायेस्ट बीडवाला तांत्रिक मुद्द्यावर रिजेक्ट झाला याला आम्ही काय करणार? ईडीच्या प्रेस नोटविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. बारामती ही एकमेव कंपनी आहे त्यात कुठेही काळा पैसा फिरून आणला गेलेला नाही. ही कंपनी आमच्या कष्टातून उभारली आहे. आजोबा, वडिलांनी ही कंपनी उभी केली, मी आता तिचं काम बघतोय. ईओडब्ल्यूने आम्हाला यापूर्वीच कन्नड कारखान्याबाबत क्लीन चीट दिली आहे. ईओडब्ल्यूवर तुमचा विश्वास नाही का?’ असा सवाल रोहित पवारांनी विचारला. ‘मी महायुती सरकारविरोधात आवाज उठवत असल्यामुळेच केवळ सुडापोटी ही जप्तीची कारवाई केली आहे. ईडीची नोटीस येणार हे मला अपेक्षित होतंच, किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर मला जेलमध्येही टाकलं जाऊ शकतं, पण त्यालाही सामोरं जायची माझी तयारी आहे. मी लढत राहणार हे नक्की’, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचा गौप्यस्फोट
‘जेव्हा सरकारविरोधात लढायला लागलो, तेव्हा पासून माझ्या ऑफिसकडे भाजपचे 2 ओबीसी नेते, अजित पवार गटाच्या 7 नेत्यांचा आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांच्या फाईल्स पाठवल्या गेल्या आहेत. मला माहिती नाही, पण सत्तेतील लोकांनीच या फाईल्स पाठवल्या असाव्यात. यावरून या सरकारमध्ये काही आलबेल आहे, असं अजिबात नाही’, असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला आहे.‘मी स्वत: उद्या कन्नड कारखान्यावर जाणार आहे, मागे हटणार नाही. या लढाईत कदापीही माझा स्वाभीमान गहाण ठेवणार नाही. या लढाईत माझ्या कुटुंबियांना त्रास होतोय, याचं वाईट वाटतं. मी त्यांची माफी मागतो. ईडीची जप्तीची नोटीस आली तरी कारखाना बंद करू शकत नाही, गाळप सुरूच राहणार. आमचा पक्ष फुटताच माझ्यावर ईडीची कारवाई सुरू होते, हे कळत नाही’, असा आरोपही रोहित पवारांनी केला.