छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यात वाद चिघळला होता. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सरकार देखील मनोज जरांगे यांच्यावर आक्रमक झाले होते. दरम्यान राज्य सराकरने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू होणार. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
यापूर्वी विधिमंडळाने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले होते. त्यावर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनीन सही केली आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले.
SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. दरम्यान आज राज्यात कायदा लागू झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला आनंद आहे… मी शपथ घेतलेली पूर्ण केली. मराठा समाजाला आरक्षण लागू झालंय … जी आर निघाला आहे. याचा फायदा मराठा तरुणांना नोकरीत आणि शिक्षणात होईल. याचे समाधान सरकार आणि मला आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाने घ्यावे. शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोललो होतो ते पूर्ण केलं. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा आनंद आहे, असे शिंदे म्हणाले.